तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करून केली कृतज्ञता व्यक्त
चांदूर रेल्वे प्रतिनिधी सुभाष कोटेचा /धीरज पवार
चांदूर रेल्वे शहरातील जि. प. शाळेत तब्बल ३३ वर्षांनी सर्व शालेय मित्र एकत्र आले व पुन्हा एकदा शाळा भरली होती. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

एकमेकांचे बदलले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचं निरीक्षण करीत तब्बल ३३ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांची डोळे आनंदी अश्रूंनी भरून आले. चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये १९८४ ते १९८८ या कालावधीत पाचवी ते दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले.
त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. परंतु पेशाने डॉक्टर असलेले दिनेश ठाकरे यांच्या मनात सर्व मित्र एकत्र येण्याचा विचार आला आणि त्यांनी ही गोष्ट शालेय जुना मित्र देवेंद्र खैर जे पेशाने शिक्षक आहे त्यांच्याजवळ म्हणून दाखविली. यानंतर दोघेही कामाला लागून एक – एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला. या कामासाठी मुकेश सूर्यवंशी, असलम शहा व इतरांनी त्यांना मदत केली. सर्व वर्ग मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन केल्यानंतर गेट-टुगेदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरले. यानुसार तीन दिवसीय “दिल दोस्ती दुबारा – ८८” हा गेट-टुगेदर कार्यक्रम घेण्यात आला.
