तत्काळ मदत देण्याची आम आदमी पार्टीची मागणी
मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
चांदूर रेल्वे – (सुभाष कोटेचा/धिरज पवार)
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे ८ मार्चला आग लागल्याने अजीमुद्दिन काजी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असतांना ९ महिण्यांपासून अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे सदर व्यक्तीला तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे विदर्भ संघटनमंत्री तथा माजी न.प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी स्थानिक तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

चांदूर रेल्वे – अमरावती मार्गावर असलेल्या मांजरखेड (कसबा) येथील अजीमुद्दिन काजी यांच्या मालकीच्या गोठ्याला ८ मार्च २०२१ ला आग लागली होती. संपूर्ण गोठा आगीत भस्मसात झाला होता. त्यामुळे तीन म्हशी, तीन वासरे भाजल्याने तसेच स्वतः अजीमुद्दिन काजी यांचे सुध्दा हात भाजल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत वित्तीय वर्ष २०२१ – २२ करिता नैसर्गिक आपत्ती बाधित झालेल्या नागरिकांना अर्थसहाय्य अनुदान या योजनेतून पूर्ण प्रकरण दाखल केले असतांना अद्यापही त्यांना कोणतेही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे सदर व्यक्तीला तत्काळ अनुदान मंजूर करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे विदर्भ संघटनमंत्री तथा माजी न.प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
