कामिका एकादशीनिमित्त ‘नाथ महाराज युवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने निघोजे गावात वृक्षारोपण…

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे:- “वृक्षारोपण करण्यासाठी दिवसेंदिवस तरुणांची संख्या लक्षणीय दिसत आहे, वृक्ष संवर्धन चळवळ राबविण्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण मंडळी पुढाकार घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबवित असल्याने ‘जिथे तरुणाई, तिथे हिरवाई’ असे म्हणावे लागेल,” असे प्रतिपादन पर्यावरण जागर महिला मंचच्या संचालिका व माजी पंचायत समिती सदस्या मंगलाताई शिंदे यांनी केले. कामिका एकादशी निमित्त चाकण औद्योगिक नगरीतील महानगाव निघोजे ( ता. खेड ) येथे नाथ महाराज युवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.

यानिमित्त शालेय मुलांनी व ग्रामस्थांनी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी काढली. जि.प. शाळेतील चिमुकल्या मुलामुलींच्या सहभागाने व समस्त ग्रामस्थ निघोजे याच्या सहकार्याने पार्वती डोंगरावरील शिव पार्वती मंदिराच्या परिसरात ‘एक मुल, एक झाड’ लावण्याचा संकल्प सर्व ग्रामस्थांकडून करण्यात आला. यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अमेरिकेत सेवा करणारे गावातील माजी विद्यार्थी गंगाधर येळवंडे यांचा वृक्षरोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टेकडीवर वड, पिंपळ, चिंच, बेल, कडुनिंब अशा विविध प्रकारच्या देशी झाडांचे रोपण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पी. टी. शिंदे, सचिव राजेंद्र जाभंळे, विश्वस्त विनोद महाळुगंकर पाटील, प्रवक्ते हनुमंत देवकर, माजी पं. स. सदस्य मंगलाताई शिंदे, माजी सरपंच कांचनताई संतोष शिंदे, माजी सरपंच सुनिताताई कैलास येळवंडे, ग्रा. पं. सदस्य संदिप येळवंडे, हिरामण आबा येळवंडे, गंगाधर येळवंडे व मुख्याध्यापक अरूण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

“रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ स्मृती वृक्ष लावण्याची पर्यावरण जागर प्रतिष्ठान राबवत असलेली संकल्पना निघोजे गावाने सुरु केली, तसेच शाळेतील विद्यार्थी पटसंख्येनुसार ‘एक मुल, एक झाड’ हा उपक्रम सुरु केला, हे कौतुकास्पद आहे.” असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रानमळा पॅटर्नचे प्रणेते पी. टी. शिंदे यांनी केले.

यावेळी सुरेखाताई जांभळे, सागर येळवंडे, नवनाथ फडके, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, संदिप येळवंडे, कालिदास येळवंडे, आत्माराम येळवंडे, बाळासाहेब येळवंडे, कमलाकर बेंढाले, अमोल बेंढाले, सोसायटी संचालक कैलास येळवंडे, संदिप प्रकाश येळवंडे, विणेकरी अष्टर थिगळे, सोमनाथ बेंढाले, सोपान येळवंडे, नामदेव येळवंडे, दत्तात्रय बटाणे तसेच नाथ महाराज युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष येळवंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर हिरामण येळवंडे यांनी आभार मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!