अकोला | २० वर्षांपूर्वीच मृत्यू झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून शासनाची दिशाभूल ; वाईन शॉप चालकाला न्यायालयाचा दणका ; पोलिसांना शरण जाणे एकच पर्याय

अकोला वार्ता :- अकोला शहरातील एका वाईन शॉप चालकाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. वाईन शॉपच्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी बनावट दस्तावेज तयार करणं, २० वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अकोल्यातील मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

इतकच नव्हे तर ७ दिवसांत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जयस्वाल यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयात जस्टीस इंदिरा बॅनर्जी आणि जस्टीस ए.के.महेश्वरी यांनी हा महत्वाचा आदेश दिला आहे.

काय आहे हे प्रकरण जाणून घ्या –

अकोल्याच्या गांधी चौकात विदर्भ वाईन शॉप नावाचं एक दुकान आहे. या दुकानाचे मुळ परवानाधारक पुरुषोत्तम गावंडे यांचा २० वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. परंतू त्यांच्या मृत्यूनंतरही जयस्वालने गावंडे जिवंत असल्याचं दाखवत दुकानाच्या परवान्याचं नुतनीकरण केलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर ही गोष्ट आल्यानंतर सखोल चौकशी केली असताना त्यांना हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार १९७३ साली पुरुषोत्तम गावंडे यांना शासनाने वाईन शॉपचा परवाना मंजूर केला होता. व्यवसायात मदत व्हावी यासाठी गावंडे यांनी ब्रिजकिशोर जयस्वाल यांच्यासोबत भागीदारी केली. १९८७ साली ब्रिजकिशोर यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र हा गावंडे यांच्या व्यवसायात भागीदार झाला.

पुरुषोत्तम गावंडे यांचं निधन आणि राजेंद्र जयस्वालचा खेळ सुरु –

२००० साली गावंडे यांचं निधन झाल्यानंतर विदर्भ वाईन शॉपची भागीदारीही संपुष्टात आली. नियमानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाला गावंडे यांच्या कायदेशीर वारसदाराच्या नावाने नवीन परवाना देणं आवश्यक होतं. परंतू राजेंद्र जयस्वालने ही बाब लपवून ठेवत बेकायदेशीर पद्धतीने दुकानाच्या परवान्याचं नुतनीकरण केलं. जयस्वालचा हा खेळ सुरु असतानाच आपली चलाखी कोणाच्याही लक्षात येणार नाही असं समजून त्याने २०१८ साली विदर्भ वाईन शॉपचा परवाना माझ्या नावाने करण्यात यावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात अर्ज केला.

खरी बाब आली समोर –

जयस्वालने हा अर्ज केल्यानंतर त्याचं बिंग फुटलं. जयस्वालचा अर्ज तत्कालीन अधिक्षक राजेश कावळे आणि जिल्हाधिकारी आस्थिक पांडे यांच्यासमोर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम परवानाधारक असलेल्या गावंडे यांच्या गावी पत्र पाठवून वारसदारांनी हजर राहण्याचे आदेश दिले. पुरुषोत्तम गावंडे यांचे पुत्र अमित गावंडे यांना ही बाब लक्षात आल्यानंतर आपल्या मृत वडिलांच्या नावाने आतापर्यंत दुकानाचा परवाना नुतनीकरण होत असल्याचं त्यांना समजलं.

अमित गावंडे यांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई करत प्रकरणाचा पाठपुरावा करत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विदर्भ वाईन शाॅप परवान्याचे नूतनीकरण करण्यात येऊ नये आणि या देशी, विदेशी दारू विक्रीचे दुकान ‘सील’ करण्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी १७ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार विदर्भ वाईन शाॅपला ‘सील’ करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आली.

जिल्हा प्रशासनानेही वाईन शॉपला सील केलं. राजेंद्र जयस्वालने जामीन अर्जासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला, परंतू त्याला तिकडे अपयश आलं. यानंतर नागपूर खंडपीठातही अपयश आल्यानंतर जयस्वालने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. परंतू सर्वोच्च न्यायालयातही जयस्वालच्या पदरात निराशाच पडली असून त्याला आता त्याला पोलिसांना शरण जाण्याशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं बोललं जातंय.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!