प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: एप्रिल महिन्यातील 16 व 17 एप्रिलला होऊ घातलेल्या बंजारा समाजाच्या साहित्य संमेलनात बंजारा समाजाव्यतिरिक्त इतरही समाजातील बुद्धिवंतांनी सहभागी व्हावे, विशेषतः अमरावती विभागातील सर्वच शिक्षक बंधू भगिनींनी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यास आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह सहभागी व्हावे असे आवाहन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केले.
आपल्या शिक्षकाने, आपल्या विद्यार्थ्यांने भरपूर वाचन करावे, साहित्य निर्मिती करावी व नवसमाज घडविण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा असे मला मनापासून वाटते असे उद्गार आमदार किरण सरनाईक यांनी काढले. गोर बंजारा साहित्य संघासोबत सर्किट हाऊस वाशिम येथे रविवारी झालेल्या सभेत ते बोलत होते.गोर बंजारा साहित्य संघाच्या या साहित्य संमेलनाचे नियोजन शेतकरी, शेतमजूर, कामगार, भजनकरी, विद्यार्थी, समाजातील नायक कारभारी, हासाबी, नसाबी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते , महिला, तरुण, तरुणी, प्रबोधनकार, या सर्वच घटकांना डोळ्यासमोर ठेऊन केल्या जात असून साहित्यिक मंडळी या संमेलनाची कणा असल्याचे प्रतिपादन संमेलनाचे महासचिव नामा जाधव यांनी काढले.
